रोटरी क्लब वरोराच्या वतीने पानपोई व गरजूंसाठी सूती दुपट्टा, चप्पल वितरण केंद्राचे उद्घाटन

  रोटरी क्लब वरोराच्या वतीने पानपोई व गरजूंसाठी सूती दुपट्टा, चप्पल वितरण केंद्राचे उद्घाटन वरोरा : रोटरी क्लब वरोरा यांनी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पानपोई (पिण्याचे पाणी) तसेच गरजू व गरीब नागरिकांसाठी सूती दुपट्टे व चप्पल वितरण केंद्राचे उद्घाटन बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. नगर परिषद वरोरा यांच्या नगराध्यक्षा सौ. अर्चना आशिष ठाकरे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष योगेश डोंगरवार, एजी अमित लाहोटी, प्रोजेक्ट हेड चेतन शर्मा, तसेच अमित नाहर, अभिजित मणियार, विशाल जाजू, अभिजित बोथले, अदनान सद्दीकोट, राम लोया, पियुष गुंडावार, विक्की आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, तसेच गरजूंना सूती दुपट्टे व चप्पलांचे वाटप व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थित नागरिकांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी रोटरी क्लब वरोराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. ...

वरोडा पंचायत समितीत अंधार; वीज बिल थकीत, कनेक्शन खंडित.

वरोडा पंचायत समितीत अंधार; वीज बिल थकीत, कनेक्शन खंडित.

वरोडा: शाम ठेंगडी /25/3/26
ग्रामीण भागाची नाळ असलेल्या वरोडा पंचायत समितीत आर्थिक वर्षाच्या शेवटी अंधारच पाहायला मिळाला. सप्टेंबर २०२५ पासून वीजबिल थकीत असल्याने महावितरणने बुधवारी (दि. २५ मार्च) वीजपुरवठा खंडित केला. यामुळे काही काळ कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते.

पंचायत समितीचे तब्बल १८० दिवसांहून अधिक काळापासून ५१ हजार ५८० रुपयांचे वीजबिल थकीत होते. वारंवार सूचना देऊनही बिल भरणा न केल्याने महावितरणने ही कठोर कारवाई केली. वीज खंडित झाल्याने संगणकाधारित सर्व कामे, ऑनलाइन सेवा, शासकीय योजनांचा अहवाल सादरीकरण, निधी वितरणासह अनेक महत्त्वाची कामे ठप्प पडली. मात्र, काही वेळाने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

आकस्मिक निधी अप्राप्त : पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर यांनी ‘तभा’शी बोलताना सांगितले की, पंचायत समितीला मिळणारा आकस्मिक निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. मार्च संपत आला तरी हा निधी न मिळाल्याने वीजबिल, वाहनांसाठी डिझेल पुरवठा आणि इतर आकस्मिक खर्च करणे अवघड झाले आहे. यामुळे प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

पंचायत समितीत कामासाठी आलेल्या नागरिकांना या कारवाईमुळे ताटकळत बसावे लागले. अनेकजण निराश होऊन परत गेले. आर्थिक वर्षाच्या अखेरीस अशी कारवाई झाल्याने कामांची गर्दी वाढली असतानाच प्रशासनाला या संकटाचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी आकस्मिक निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Comments