वरोरा, दि. ४ मार्च: वरोरा तालुक्यातील दूध, दही आणि खव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आसाळा गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. होळीच्या सणानिमित्त गुराखी दारूच्या नशेत झोपून राहिल्याने चरायला नेलेल्या जनावरांचा मागे राहिला नाही. याचा फायदा घेत कपाशीच्या शेतात घुसलेल्या दहा दुधाळू म्हशींनी शेतात जंगली जनावरांसाठी टाकण्यात आलेले विषारी पायझन खाल्ल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.
आसाळा गावातील गुराखी दररोजप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात जनावरे चारायला नेत होता. मात्र, होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर त्याने मद्यपान केले होते. चराईदरम्यान तो झाडाखाली झोपून राहिला. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या जनावरांचा मागे राखण करण्यासाठी राहिला नाही. ही जनावरे शेजारील एका कापूस लागवड केलेल्या शेतात घुसली होती.
या शेतात रानटी डुक्कर, रानगवे यांसारख्या जंगली प्राण्यांपासून पिकाचे रक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्याने विषारी पायझन (कीटकनाशक) टाकून ठेवले होते. म्हशी चारा खात असताना म्हशींनी हे विषारी पदार्थ खाल्ले आणि काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडू लागली.
या दुर्घटनेत खालील शेतकऱ्यांच्या म्हशी गंभीर आजारी पडल्या आहेत:
· आनंदराव देवगडे यांच्या ३ म्हशी
· रमेश मिलमिले यांच्या २ म्हशी
· मारोती मगरे यांच्या २ म्हशी
· भास्कर जांभुळे यांची १ म्हैस
· मधुकर डुकरे यांच्या २ म्हशी
अशा एकूण दहा दुधाळू म्हशी या विषबाधेमुळे आजारी पडल्या आहेत. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
या घटनेमुळे गावातील दूध उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मागील दोन-तीन दिवसांपासून या म्हशी आजारी असल्याने त्यांचे दूध काढणे जवळपास अशक्य झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या दुग्धव्यवसायाला मोठा फटका बसला आहे.
एकीकडे दूध उत्पादन बंद झाल्याने उत्पन्नाचे संकट तर दुसरीकडे उपचारांचा मोठा आर्थिक बोजा यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. प्रत्येक म्हशीवर उपचार करण्यासाठी दोन ते अडीच हजार रुपये खर्च येत असून, दहा म्हशींमागे शेतकऱ्यांवर साधारणतः पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा आर्थिक बोजा पडला आहे.
पायझनच्या प्रमाणानुसार या म्हशींचा मृत्यूदेखील होऊ शकतो, अशी भीती पशुवैद्यकांनी व्यक्त केली आहे. उपचार सुरू असूनही म्हशींची प्रकृती गंभीर असल्याने शेतकरी वैतागला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रभावित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच, जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतात विषारी पदार्थ टाकण्यापेक्षा पर्यायी उपाय योजण्याची गरजही यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
---
Comments
Post a Comment