इरई नदी खोलीकरण कामाच्या प्रगतीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा*

*इरई नदी खोलीकरण कामाच्या प्रगतीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा*

चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : जिल्हा प्रशासनाच्या वतीने चंद्रपूर शहराची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचे खोलीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. 25 एप्रिल रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 28) कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत, तहसीलदार विजय पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, इरई नदी खोलिकरण अभियान 45 दिवस चालणार असून या कामासाठी जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या समित्यांचे गठन केले आहे. यात नियेाजन समिती, गौन खनीज /साठा विल्हेवाट समिती, निधी / यंत्र सामुग्री उपलब्धता समिती, खोलीकरण क्रियान्वयन समिती, यंत्रसामुग्री दर निश्चिती, लागणारे इंधन व वंगण खर्च समिती, भरण करावयाच्या जागा निश्चिती व नियोजन समिती, प्रचार – प्रसार व जनजागृती समिती यांचा समावेश आहे.

प्रत्येक समित्यांनी आपापले काम अतिशय गांभिर्याने करणे आवश्यक आहे. नदीच्या खोलिकरणातून काढण्यात आलेला गाळ शेतक-यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतक-यांना वाहनाची व्यवस्था स्वत: करावी लागेल. तर व्यावसायिक कामासाठी निश्चित करण्यात आलेली रॉयल्टी व आवश्यक शुल्क भरणा करून वाळू किंवा वाळूमिश्रीत गाळ नेता येणार आहे. ज्यांना खोलिकरणातून गाळ, किंवा वाळू न्यायची आहे त्यांच्या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी एसओपी तयार करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.



Comments