सोयाबीन पीक लागवड तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न*

*सोयाबीन पीक लागवड तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न*

वरोरा 
प्रतिनिधी 

 आगामी खरीप हंगाम नियोजनासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व बेस्ट ऍग्रो लाइफ लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कृषी अधिकारी, वरोरा यांचे मार्फत लक्ष्मी सभागृह, शेगाव बु. येथे विभागीय कृषी सहसंचालक नागपूर तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर शंकर तोटावर यांचे प्रमुख उपस्थितीत सोयाबीन पीक लागवड तंत्रज्ञान कार्यशाळा दिनांक 24 मे 2024 रोजी संपन्न झाली. कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी, वरोरा सुशांत लव्हटे यांनी मागील वर्षी सोयाबीन पिकामध्ये कीड रोग व बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पिकाची नुकसान झाले त्याकरिता यावर्षी सोयाबीन पिकाची योग्य पद्धतीने व योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड व पीक व्यवस्थापन होणे गरजेचे असल्यामुळे सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रास्ताविकात म्हटले. मार्गदर्शन करतांना बेस्ट ऍग्रो लाइफ लिमिटेड चे मार्केटिंग मॅनेजर दीपक विधाते यांनी सोयाबीन पिकाची पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचा सल्ला दिला. त्यामध्ये विविध बुरशीनाशक तसेच कीटकनाशकांच्या कॉम्बिनेशन चे औषधाचा बीज प्रक्रियेसाठी दिलेल्या शिफारशीनुसार वापर करण्याबाबत सांगितले. मंडळ कृषी अधिकारी शेगाव बु. विजय काळे यांनी शेगाव परिसरामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या पीक रचनेबाबत, या भागामध्ये लागवड करण्यात येत असलेल्या सोयाबीन पिकाबाबत तसेच पीक लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत, लागवडीवरील खर्च कमी करण्याकरिता जैविक व नैसर्गिक कृषी निविष्ठांच्या वापराबाबत माहिती दिली. कार्यशाळेच्या औचित्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचे सन 2020 चे वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश बापूरावजी गरमडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेगाव बु. येथील कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून पुष्पगुच्छ देऊन शंकर तोटावर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग नागपूर तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर शंकर तोटावर यांनी सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढीच्या दृष्टीने सोयाबीन पिकातील अष्ट सूत्री चे महत्व समजावून सांगितले. सोयाबीन पेरणीपूर्वी बियाणे प्रतवारी, बियाणे उगवन शक्ती तपासणीच्या घरगुती पद्धती, बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणे, दहा वर्षाच्या आतील प्रसारित झालेल्या सुधारीत वाणांचा वापर करणे, बीज प्रक्रिया, बियाण्याची योग्य अंतरावर व खोलीमध्ये बीबीएफ च्या सहाय्याने, रुंद सरी वरंबा पद्धतीने, टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरणी करणे, पेरणीची पद्धत व प्रति एकर वापरावयाची बियाणे मात्रा त्यासोबतच तुर पिक आंतर पद्धतीने घेणे, रासायनिक खताचे प्रति एकर मात्रा व विविध खतांचा संतुलित वापर, जमिनीची सेंद्रिय कर्ब व प्रति ग्राम जिवाणूंची उपलब्धता लक्षात घेता शक्यतो तणनाशकाचा वापर टाळून भौतिक तसेच मशागतीय पद्धतीने तण नियंत्रण करणे, पिकामध्ये तणनाशकाचा वापर कमीत कमी करणे, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्याकरिता कंपोस्ट खत, चांगले कुजलेले शेणखत यासारख्या सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर करणे, त्यासोबतच पीक लागवडीवरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केले. मागील वर्षी सोयाबीन पिकावर बुरशीच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे पिकाचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या प्रादुर्भावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेस्ट ऍग्रो लाइफ लिमिटेड चे सचिन ठाकरे व आभार दीपक विधाते यांनी मानले. कार्यक्रमाला कृषी विभागाचे तसेच बेस्ट ऍग्रो लाइफ लिमिटेड चे कर्मचारी आणि परिसरातील कृषी निविष्ठा विक्रेते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments