**मानधन थकल्याने आशा सेविकांचा संताप; चंद्रपूर जिल्हा परिषदेवर धडक, २१ एप्रिलपासून मुंबईत बेमुदत संपाचा इशारा!**
**मानधन थकल्याने आशा सेविकांचा संताप; चंद्रपूर जिल्हा परिषदेवर धडक, २१ एप्रिलपासून मुंबईत बेमुदत संपाचा इशारा!**
*चंद्रपूर:*अंकूश अवथे
"सहा महिन्यांचे मानधन थकले आहे, आम्ही आमचे कुटुंब पोसायचे कसे?" असा संतप्त सवाल करत आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेने गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयावर जोरदार धडक दिली. राज्य उपाध्यक्ष कॉ. विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात हजारो महिला कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले.
ऑक्टोबर २०२५ पासून केंद्र सरकारकडून मिळणारे मानधन प्रलंबित असल्याने आशा सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. निवेदनात प्रामुख्याने आशा व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ करणे, आणि ७० वर्षांवरील लाभार्थी नोंदणी यांसारख्या ऑनलाइन कामांसाठी अत्याधुनिक अँड्रॉइड मोबाईल व डेटा पॅक पुरवणे या मागण्या करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत सुविधा मिळत नाही, तोपर्यंत 'मात्रा ऍप'वरील कामाची सक्ती करू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत केंद्र व राज्य सरकारला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. थकीत मानधन त्वरित न मिळाल्यास व दिलेल्या विविध मागण्याची पुर्तता न झाल्यास २१ एप्रिल रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी तीव्र आंदोलन आणि बेमुदत संप पुकारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात कॉ. निकिता नीर, सुहासिनी वाकडे, ममता भीमटे यांच्यासह जिल्ह्यातील हजारो आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment