२३ मार्च २०२६ – भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अमर शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या बलिदान दिनानिमित्त विविध संस्थांतर्फे आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याच दिवशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमात वक्त्यांनी क्रांतिकारकांच्या विचारांवर भाष्य करताना आजच्या राजकारणात त्यांची प्रासंगिकता अधोरेखित केली.
अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ. अरविंद ढोके होते. त्यांनी आपल्या भाषणात एक महत्त्वाचा सवाल उपस्थित करताना म्हटले की, “भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे क्रांतिकारी विचार आजच्या पिढीतील राजकारणाला पटतील का? ‘मैं नास्तिक क्यों हूँ’ हे विचार वाचताना काही लोकांच्या माथ्यावर वळ्या पडतील.” त्यांचे हे परखड मत उपस्थितांच्या लक्षात राहिले.
प्रमुख वक्ते म्हणून प्रा. एम. एम. मुंडे, नरेंद्र कन्नाके, परमानंद तिराणिक, चेतन लुथडे, बाळासाहेब पिसाळ यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन भाऊ मत्ते यांनी केले, तर सूत्रसंचालन नीरज आत्राम यांनी केले. आभार प्रदर्शन समीर बारई यांनी केले.
नितीन मत्ते यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले की, विद्यमान काळात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या क्रांतिकारकांच्या विचारांची समाजाला नितांत गरज आहे. बाळासाहेब पिसाळ यांनी खंत व्यक्त करताना म्हटले की, “या अनेक क्रांतिवीरांनी ज्या उदात्त हेतूने स्वातंत्र्य मिळवून दिले, तो हेतू स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी पूर्णत्वास नेला नाही, ही खंत आहे.”
प्रमुख वक्ते प्राध्यापक मुंडे यांनी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या समाजापुढे न आलेल्या सुप्त गुणांवर व जीवनपटावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे व प्रबोधन मित्र मंडळ सदस्य समीर बारई, परीक्षित एकरे, राजू डांगे, राहुल पावडे, देवेंद्र गावंडे, बाबा आगलावे, प्रशांत बावणे, एड मकरंद डुंबरे, विनोद नंदूरकर,गंधारे जी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमातून शहीदांच्या विचारांशी प्रामाणिक राहण्याचे आवाहन करण्यात आले. अखेर ‘इंकलाब जिंदाबाद’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणांनी सभागृह गुंजून उठले.
Comments
Post a Comment