वरोरा : शहरात भटक्या कुत्र्यांचा संचार मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी नागरिकांशी सोशल मीडिया मार्फत संवाद साधत मोठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वरोरा शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर अमर्याद प्रमाणात वाढला असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली. यावर वरोरा शहरातील नागरिकांनी सोशल मीडिया कॉमेंट्स वर अनेक समस्या त्यांच्यापुढे मांडलेले आहेत.
नगराध्यक्ष ठाकरे म्हणाल्या, "भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. नगर परिषद प्रशासन यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहेच, परंतु नागरिकांनीही स्वतःच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्या परिसरात हिंस्त्र किंवा संशयास्पद भटके कुत्रे आढळल्यास कोणतीही जोखीम न पत्करता तात्काळ नगर परिषद प्रशासनाला कळवावे."
त्यांनी विशेषतः लहान मुलांच्या पालकांना आवाहन केले की, मुलांना रस्त्यावर एकटे सोडू नये आणि त्यांच्यावर लक्ष ठेवावे. ज्येष्ठ नागरिकांनीही सकाळ-संध्याकाळच्या वेळेत सतर्कता बाळगावी, असे सांगितले. नगराध्यक्ष यांनी शेवटी विश्वास दिला की, नागरिकांची सुरक्षा हीच प्रशासनाची प्राथमिकता आहे. "सतर्क राहा, सुरक्षित राहा," असे आवाहन त्यांनी केले.
Comments
Post a Comment