*चांगल्या उत्पादनाची आशा असताना रोग येण्याची शक्यता*
वरोडा : शाम ठेंगडी
यंदा तालुक्यातील आंबा झाडाला समाधानकारक बहर आल्याने आंबा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबा उत्पादक मोठ्या संकटात सापडले होते.
मात्र यावर्षी थंडीचा कडाका, कोरडे वातावरण आणि पोषक हवामान यामुळे बहुतांश आंबा झाडांना एकसारखा व दाट मोहोर फुललेला दिसून येत आहे. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन चांगले होईल अशी शक्यता आहे. दरम्यान काही दिवसापासून तालुक्यात ढगाळ हवामान निर्माण झाल्याने आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.
सूर्यप्रकाश कमी होणे, हवेत आर्द्रता वाढणे आणि तापमानात होणारा चढ उतार यामुळे मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास मोहोर गळण्याची भीती असून त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. या ढगाळ हवामानामुळे तुडतुडे, मुरी, करपा यासारख्या रोगांचा धोका वाढण्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे.
तुडतुडे ही कीड मोहोरातील रस शोषून घेते. त्यामुळे फुले कोमेजून गळून पडतात. मुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोहोर काळवंडतो आणि उत्पादनात घट होते. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंब्याचा मोहोर टिकवण्यासाठी त्यावर औषध फवारणी पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असते.या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.
मोहोर या अवस्थेत असताना रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणत्या औषधाची फवारणी करावी, किती प्रमाणात पाणी द्यावे, कोणते प्रतिबंधात्मक उपाय करावेत याबाबत सूचना देण्याची मागणी आंबा उत्पादक करीत आहेत.
Comments
Post a Comment