*शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक पायपीट*
वरोडा : शाम ठेंगडी
दरोडा शहराला मुख्य पाणीपुरवठा करणारी १९७२ साली बांधलेली तूराणा पाणीपुरवठा नदी योजना आता कुचकामी ठरण्याच्या अवस्थेत आहे. अर्धशतकापेक्षा जुनी झालेली ही योजना आजच्या वाढलेल्या लोकसंख्येपुढे पूर्णतः अपुरी पडत असून गळतीग्रस्त मुख्य पाईपलाईन, अप्रभावी फिल्टर प्लांट आणि पाणीगळती व स्पष्ट नसलेल्या नकाशामुळे शहरवासियांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी१९७२ मध्ये तत्कालीन लोकसंख्येच्या गरजेनुसार बांधण्यात आलेला हा २.५ एमएलडी क्षमतेचा प्लांट आज मुदत बाह्य ठरत आहे. शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने पाण्याची मागणीही त्यापटीने वाढली आहे. पाणीपुरवठा तज्ज्ञांच्या मते, आज शहराला दररोज किमान १५ ते २० एमएलडी पाणी पुरवठा करू शकणारी आधुनिक योजना आवश्यक आहे.
तूराणा गावापासून फिल्टर प्लांटपर्यंत ३०० मिमी (बारा इंच) चार किलोमीटरची लाईन आणि फिल्टर प्लांटपासून टाकीपर्यंत २५० मिमी (दहा इंच) अंदाजे तीन किलोमीटर जुनी पाईपलाईन आहे. यात मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने प्लांट २४ तास चालू असूनही शहराला पुरेसे पाणी पोहोचू शकत नाही. परिस्थिती इतकी बिकट आहे की, शहराला पाणी पुरवण्यासाठी नगरपालिकेने ६० ते ६५ बोरवेल मारून ते जुनी पाईपलाईनशी जोडले आहेत. शिवाय १९७२ पासूनच्या शहरात पसरलेल्या पाईपलाईनचा नकाशा नगरपालिकेकडे नसल्यामुळे दुरुस्तीचे कामही योग्य पद्धतीने होऊ शकत नाही.
पाणीपुरवठा खात्यात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ही संपूर्ण सेवाच कोलमडलेली आहे. त्यामुळे ठेकेदारी पद्धतीने योजना चालवण्यात येत आहे. या ठेकेदारांच्या माध्यमातून पुरवले जाणारे पाणी किती शुद्ध आहे, यावरही प्रश्नचिन्ह आहे. काही भागात जुन्या कोळसा खाणीमुळे बोरवेल मारता येत नसल्याने तेथील लोकांची स्थिती अधिक दयनीय आहे.
या परिस्थितीत एका एनजीओमार्फत शहरात ११ वॉटर एटीएम स्थापन करण्यात आले आहेत. यामधून नागरिकांना शुद्ध केलेले पाणी २० लिटरसाठी ५ रुपये दराने विकत घ्यावे लागते.शुद्ध पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते. नगरपालिका दरवर्षी प्रति कनेक्शन सुमारे १२०० रुपये पाणी कर द्यावा लागत असतानाही नगरपालिका मात्र नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करू शकत नाही. वरोडा शहरात अंदाजे ५००० च्यावर नळकनेक्शन असल्याची माहिती आहे.
ही समस्या दशकांपासून चालत आलेली असून यावर कायमस्वरूपी उपाय योजना केलेली नाही. वारंवार तात्पुरते दुरुस्तीचे खर्च केले जात असले तरी स्थायी समाधानाकडे दुर्लक्ष होत आहे. सदर समस्येचे स्थायी निराकरण करणे हे आता नव्याने पदास्त झालेल्या नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांच्या प्रशासनाला आवश्यक आहे. यामध्ये सर्व पक्षांनी व स्थानिक लोक नेत्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी व शहराच्या भविष्यासाठी एक कार्यक्षम, टिकाऊ आणि विस्तारीत पाणीपुरवठा योजना राबविणे अत्यावश्यक झाले आहे.
शहरांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था एक दिवसाआड काही प्रभागामध्ये केली जाते. तर काही भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा होत नाही. त्यांना बोअरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
वरोडा शहरांमध्ये पाण्याचे स्त्रोत कमी असल्यामुळे नवीन कनेक्शन देताना फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. थातूरमातूर पाईपलाईन टाकून कनेक्शन दिल्या जात आहे. त्यामुळे नळाला पाणी येत नसल्याची समस्या मोठ्या प्रमाणात शहरात निर्माण झाली आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी खाली जात असल्याने ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते.
..................
Comments
Post a Comment