*चंद्रपूर जिल्ह्यातील लष्करी अळीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या : आ. सुधीर मुनगंटीवार**ना. आशिष जयस्वाल यांनी दिले प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्याचे आश्वासन*
*ना. आशिष जयस्वाल यांनी दिले प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्याचे आश्वासन*
*चंद्रपूर, दि. ४ : चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये धान व कापूस पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लष्करी अळीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांच्याकडे केली.*
चंद्रपूर जिल्ह्यातील लष्करी अळीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ४ जून रोजी मंत्रालयात राज्याचे कृषी राज्यमंत्री ना. श्री. आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार, संबधित अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा व जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये सुमारे ३७,००० हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीमुळे पीक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. या आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आणि योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी ठाम मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत केली. लष्करी अळीमुळे हजारो शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न संकटात आले. म्हणूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली.
या आढावा बैठकीत कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांनी आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना न्याय मिळेल, याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्र्यांनी दिली.
Comments
Post a Comment