*आर्णीमध्ये ३ जून रोजी 'शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व मेळावा'**काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार*
*काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार*
*चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना 'शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व मेळाव्या'त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आवाहन*
चंद्रपूर: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस पक्षाने आर्णी येथे 'शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व शेतकरी मेळाव्या' चे आयोजन केले आहे. येत्या मंगळवार, दिनांक ३ जून २०२५ रोजी हा कार्यक्रम संपन्न होणार असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पदयात्रा व मेळाव्याला चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी केले आहे.
*भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर काँग्रेसचा हल्लाबोल*
काँग्रेस पक्षाने भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची आणि शेतमालाला हमीभाव देण्याची घोषणा केली होती. मात्र, सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी तर दूरच, खत, बियाणे, औषधांचे भाव बेसुमार वाढवले. तसेच, बोगस खते, बियाणे, औषधे आणि तणनाशके शेतकऱ्यास विक्री करणाऱ्या कंपन्यांना अटकाव केला नाही. पिकविम्यातही बेईमानी केली. गेल्या १०-११ वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारने शेतकरी विरोधी धोरणांचा सपाटा लावला असून, शेतीमालावर गरज नसताना निर्यातबंदी-आणि आयात वाढवून शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अर्थसंकल्पातही शेतीवरील खर्चात कपात केल्याने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कंगाल करून सोडल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
*प्रमुख मागण्या*
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, सरसकट पिकविमा, शेतमालाला हमीभाव, शेतीला मोफत वीज यांसह इतर मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने या शेतकरी पदयात्रा व मेळाव्याचे आयोजन केले आहे.
*'दाभडी'तूनच पदयात्रेचे कारण*
ही पदयात्रा दाभडी येथूनच सुरू होण्यामागे एक विशेष कारण आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील दाभडी या गावी तत्कालीन भाजपचे पंतप्रधान पदाचे दावेदार नरेंद्र मोदींनी २० मार्च २०१४ रोजी 'चाय पे चर्चा' नावाने एक स्वप्नरंजित सोहळा घेतला होता. काँग्रेसच्या मते, याच दिवशी शेतकऱ्यांच्या मरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली, हा शेतकऱ्यांच्या आयुष्यातील काळा दिवस होय. मोदींनी या ठिकाणी शेतकऱ्यांना भरमसाठ खोटी आश्वासने दिली होती, जी देशाच्या इतिहासात 'ऐतिहासिक लबाडी' म्हणून कोरली गेली आहे. या फसवेगिरीवर त्यावेळी भोळ्या शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि २०१४ ला भाजपचे सरकार स्थापन झाले. देशभरातील शेतकऱ्यांची फसवणूक करून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. पहिल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. आपली फसगत झाली हे शेतकऱ्यांच्या लक्षात आले, परंतु २०१९ ची निवडणूक भाजपाने पुलवामा सैनिक हत्याकांडाची भावनिक चाल आखून जिंकली. आज या आश्वासनांना सुमारे अकरा वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. या कालावधीत शेतकऱ्यांची अवस्था मरणाहून वाईट झाली आहे. म्हणूनच, याच दाभडीतून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वात 'शेतकऱ्यांची आत्मसन्मान पदयात्रा' काढण्याचा काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे.
*कार्यक्रमाचे स्वरूप आणि उपस्थित मान्यवर*
मंगळवार, दिनांक ३ जून २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता ही शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा ओंकारेश्वर मंदिर दाभडी, ता. आर्णी येथून सुरू होईल आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णी येथे पदयात्रेचे रूपांतर शेतकरी मेळाव्यात होईल.
या पदयात्रेत खासदार प्रणितीताई शिंदे, माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, खासदार नामदेव किरसान, खासदार प्रशांत पडोळे हे सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकरावजी ठाकरे व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली.
या पदयात्रा व मेळाव्याला शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन या विभागाच्या खासदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment