शेतमाल तारण घोटाळ्यासंबंधी चार जणांवर गुन्हा दाखल
वरोरा
फक्त बातमी
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बहुचर्चित शेतमाल तारण घोटाळ्यामध्ये चार जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. येथे शेतमाल तारण योजनेत शेतमाल ठेवलाच नाही. मात्र, बनावट कागदपत्र तयार करून ४६ लाख ५८ हजार ५० रुपये तीन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर चौकशी झाली. त्यानंतर निलंबित पर्यवेक्षकासह चार जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
करोडो रुपयांच्या कांदा घोटाळा प्रकरणात दोषी
असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत तत्कालीन पर्यवेक्षक कोमल गारगाटे यांच्याकडे शेतमाल तारण योजनेची जबाबदारी होती. शेतमाल तारण योजनेत ठेवल्यास शेतकऱ्यांना ७५ टक्के रक्कम ताबडतोब दिली जाते. यामध्ये गारघाटे याने २१ एप्रिल २०२२ ते १२ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये शेतमाल तारण योजनेत शेतमाल ठेवला नाही. मात्र, त्याने बनावट कागदपत्र तयार करून अनिल मधुकर तडसे यांच्या बँक खात्यावर ३१ लाख ७७ हजार २५८, विजय पुंजाराम कळसकर यांच्या खात्यावर १९ लाख ८५ हजार ३७२ व गुरुदत्त महादेव कुळसंगे याच्या खात्यावर ४ लाख ९५ हजार ४२० असे एकूण ४६ लाख ५८ हजार ५० रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बँक खात्यावरून जमा केले. परंतु यामध्ये तारण योजनेत सोयाबीन दिसून आले नाही. विशेष म्हणजे, यापूर्वीच पर्यवेक्षक गारघाटे याला निलंबित केले होते.
तारण योजनेतील घोटाळ्याबाबत बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे यांनी पोलिस ठाण्याला तक्रार दिली. त्या तक्रारीवरून कोमल गारघाटे, अनिल तडसे, विजय कळसकर आणि गुरुदत्त कुळसंगे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४०९, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment