चंद्रपूर, दि. 22 मार्च : विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभीश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली 22 मार्च रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर लोक अदालतीमध्ये प्रलंबीत न्यायालयीन प्रकरणे एकुण 9447 व दाखलपुर्व प्रकरणे 15842 ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबीत न्यायालयीन प्रकरणांपैकी 774 प्रकरणे तर दाखलपुर्व प्रकरणांपैकी 366 अशी एकूण 1340 प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रलंबीत प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे 25 निकाली काढण्यात आली असुन नुकसान भरपाई रक्कम 2 कोटी 19 लाख 55 हजार रूपये वसुल करण्यात आली. निकाली प्रकरणांपैकी एका प्रकरणात 45 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. तसेच भुसंपादनाची एकुण 6 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात नुकसान भरपाईची रक्कम 42 लाख 17 हजार रूपये मंजुर करण्यात आले. धनादेश प्रकरणांपैकी 125 प्रकरणे निकाली काढण्यात आली. कामगार व औद्योगीक न्यायालयातील एकुण 3 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
चंद्रपूर जिल्हयातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, सर्व वकील, सर्व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.
Comments
Post a Comment