बीएस इस्पात कंपनीच्या अधिकाऱ्यांस कामगार व नागरिकाची मारहाण

बीएस इस्पात कंपनीच्या अधिकाऱ्यांस कामगार व नागरिकाची मारहाण*
  *सरपंच-उपसरपंचासह 20 जणांवर गुन्हे दाखल*
 *सरपंचानेही दाखल केली तक्रार*

वरोडा :
           चंद्रपूर नागपूर राज्य मार्गावरील बी एस इस्पात या कंपनीतील व्यवस्थापकीय अधिकाऱ्यास आज सोमवार 21 नोव्हेंबरला सकाळी कामगारासहित नागरिकांनी मारहाण केली केल्याची घटना घडली. या घटनेमुळे  दहशत निर्माण झाली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी वरोडा पोलिसांनी वीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे .मजरा येन्साच्या सरपंचा यांनीही याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे .
     चंद्रपूर नागपूर राज्य महामार्गावरील मजरा येथून काही अंतरावर बीएस इस्पात नामक वीज निर्मिती कंपनी आहे. 
      ही कंपनी कोरोना काळात बंद होती. 2021 मध्ये या कंपनीचे देखभालीचे काम सुरू करण्यात आले. यासाठी 40 कामगारांना कामावर घेण्यात आले होते .परंतु पावसाळ्यात विद्युत निर्मितीसाठी  लागणाऱ्या कोळशाची आपूर्ति होत नसल्याने  या कंपनीतील कार्यरत कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते व काम सुरू होताच या कामगारांना टप्प्याटप्प्याने रुजू करून घेण्याचे ठरले होते.
     या कंपनीत कंत्राटदारद्वारे कामगार नेमले जातात. काही दिवसापूर्वी कंपनीत बंद असलेल्या यंत्राच्या ट्रायलचे काम सुरू झाले .त्यामुळे गरजेनुसार दहा कामगारांना रुजू करून घेण्याचे ठरले .
         यानुसार कंत्राटदाराकडे मागणी करण्यात आली. परंतु  आज सोमवार दिनांक 21 नोव्हेंबरला सकाळी दहाच्या सुमारास मजरा-येन्सा ग्रामपंचायतच्या सरपंचा वंदना निब्रड ,उपसरपंच प्रमोद तोडासे यांच्या नेतृत्वात कामगारांसह 50 ते 60 नागरिकांनी कंपनीवर धडक दिली व कंपनीत व्यवस्थापन अधिकारी यांना चर्चेसाठी बाहेर येण्या संबंधी सूचना दिली. मात्र त्यांनी  चर्चेसाठी एका शिष्टमंडळासह कंपनीच्या कार्यालयात यावे अशी भूमिका घेतली. परंतु यावर कामगार व नागरिक राजी न झाल्याने अखेर मनीष कातंगळे हे स्वतः कंपनीच्या प्रवेशद्वारावर चर्चेसाठी आले .यावेळी चर्चा करताना नागरिक कामावरून कमी केलेल्या सर्व 45 जणांना कामावर घेण्याचा आग्रह करू लागले. यावर संबंधित अधिकाऱ्याने सध्या दहा कामगारांची गरज असल्याने यांना रुजू करून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने कामावरून कमी करण्यात आलेल्या सर्व कामगारांना कामावर घेण्याचे स्पष्ट केले. 
     परंतु नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी वाद वाढत गेला व नागरिकांनी मनीष काटंगळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत मनीष कटांगळे यांच्या हातावर, डोक्यावर व पाठीवर बराच मार लागला. घटना घडत असताना कंपनीतील रक्षक कामगार अधिकारी मनीष कटांगळे यांच्या रक्षणासाठी धावून आले असता नागरिकांनी त्यांनाही ढकलले व ' " तुम्ही गावातून कसे जाता " म्हणून धमकी दिली .
     स्थितीत मनीष कटांगळे  प्रवेशद्वारातून कंपनीचे आत शिरले . त्यामुळे ते बचावले.  
       मनीष कटांगळे यांनी  वरोडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याप्रकरणी सरपंच वंदना निब्रड, उपसरपंच प्रमोद तोडासे, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा सारिका धाबेकर, हर्षल निब्रड सुभाष लढोदिया, धनराज वांढरे, संजू सुखदेवे ,राहुल बोंडे यांच्यासह आणखीन 12 जणांवर  भादविनुसार गुन्हा नोंदविला आहे .
*अधिका-यांनीच वाद केला:सरपंचा*
       मजरा-येन्साच्या सरपंच वंदना निब्रड यांनीही याप्रकरणी र्पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यांच्या नुसार कामावरून कमी केलेल्या सर्व कामगारांना कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी आपण सकाळी साडेनऊच्या सुमारास 50 ते 60 लोकांसह कंपनीवर गेलो असता कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी यांनी आपल्याशी वाद केला व आपण दहा जणांना कामावर घेण्यास तयार असल्याचे सांगितले व त्यावर ते ठाम होते. मात्र आम्ही सर्वांना घेण्यासाठी आग्रही होतो असे म्हटले आहे .
            परंतु यावर तोडगा न निघाल्याने वाद वाढत गेला व त्याचे रूपांतर मारहाणीत झाल्याचे आमच्या प्रतिनिधीस सांगितले.
    कंपनी ग्रामपंचायत परिसरात असल्याने ग्रामपंचायत ठरवेल त्याच कामगारांना कामावर घेण्यात यावे अशी भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली .
    आपल्या सरपंचाबद्दल केल्याने आपणास राग आल्याचे इतर नागरिकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलीस काय भूमिका घेतात हे स्पष्ट झाले नाही .वृत्त लिहिस्तोवर यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

Comments