बातमी:
वरोरा : लग्नसराईच्या हंगामात अनेक नागरिक आपल्या घरांना कुलूप लावून बाहेरगावी कार्यक्रमासाठी जात असल्याने घरफोडीच्या घटनांचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन वरोरा यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांच्या निवेदनानुसार, घर बंद करून बाहेर जाताना काही महत्त्वाच्या गोष्टींची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. घराचे कुलूप बाहेरून टॉर्च मारल्यावर दिसणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच लोखंडी गेटला बाहेरून कुलूप न लावता आतूनच लॉक करावे, जेणेकरून घर बंद असल्याचे सहज लक्षात येणार नाही.
याशिवाय, घरात मौल्यवान वस्तू किंवा मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवणे टाळावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती रात्री किंवा दिवसा फिरताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वरोरा पोलिसांनी नागरिकांना सावध राहून स्वतःच्या आणि परिसराच्या सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
...........
Comments
Post a Comment